मराठी ब्लॉग विश्व

Sunday 2 December 2012

भगवंता


शरण आलो तुला, पण संपला ना त्रास भगवंता
तुझ्या असण्यावरी ठेवू कसा विश्वास भगवंता ?

प्रपंचातून जर आहे दिला मी वेळ भक्तीला
कशाला सांग मी घेऊ उगा संन्यास भगवंता ?

नको छेडूस प्रश्नाला "पुरे की आणखी देऊ ?"
मनुष्याने कधी म्हटलेच नाही 'बास' भगवंता

कधी कळणार लोकांना, कसे जिंकायचे तुजला ?
मनी अंधार वसला अन घरी आरास भगवंता

जगाची सर्व दु:खे दूर करणे शक्य का नाही ?
कदाचित तोकडे पडले तुझे सायास भगवंता

वैभव फाटक ( ३ डिसेंबर २०१२)

No comments:

Post a Comment